TOD Marathi

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुखद निधन झाले आहे. आज सकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Sr Marathi actor Pradeep Patwardhan passes away)

प्रदीप पटवर्धन यांची ‘मोरुची मावशी’ या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. विजय चव्हाणांसाठी जितकी ‘मोरुची मावशी’ बघायला प्रेक्षक येतं, त्यापेक्षा जास्त प्रदीपसाठी येतं असतं, इतकी क्रेझ त्यांची होती, अशी आठवण दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांच्या मावशी वसुंधरा साबळे (Vasundhara Sable) यांनी सांगितली आहे.

लेखक आणि गीतकार ओंकार मंगेश दत्त यांच्या आई आणि दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट फेसबुकवर शेअऱ केली आहे. त्यात त्या लिहितात, “आज आमचा प्रिय मीत्र प्रदीप उर्फ पट्या आम्हाला सोडून गेला. ही धक्कादायक बातमी मला आत्ता केदारने कळवली आणि क्षणभर काही सुचेचना… क्षणभरातच माझ्या आयुष्यातल्या प्रदीपच्या आठवणी झरझर डोळ्या समोरुन सरकत गेल्या…तारुण्यात अतिशय देखणा दिसणारा प्रदीप मुलींच्या गळ्यातला अक्षरशः ताईत होता..गिरगावात तो रहायचा आणि गणपती विसर्जनात प्रदीपचा नाच हे तिथलं मुख्य आकर्षण असायच.. एकांकिका करत करत तो नाटकांकडे वळला.. टूर टूर, मोरुची मावशी ही त्याची त्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरची नाटकं.. मुली विजय चव्हाणसाठी जितकं मोरुची मावशी बघायला येत त्यापेक्षा जास्त प्रदीपसाठी येत असतं इतकी क्रेझ होती त्याची.. नृत्य ही त्याची आवड होती आणि म्हणुनच आमच्या लोकधारामधे “आठशे खिडक्या नवशे दारं” साठी प्रदीपची वर्णी लागली आणि त्याने त्याचं अक्षरशः सोनं केल.. त्याच्या सारखा तो डान्स परत कुणीही करु शकल नाही..”

पुढे त्या लिहितात, “स्टेजवर जेवढा अवखळ होता तो तितकाच वैयक्तिक बराच शांत होता..खासगी आयुष्यही मोकळेपणाने शेअर कराव इतकी आमची मैत्री होती.. मागील काही वर्ष मात्र तो फारच आक्रसुन गेला होता..अभिनय सांभाळून शेवटपर्यंत बँकेतली नोकरी करत असल्यामुळे त्याला आर्थिक चणचण नव्हती पण कलावंतांच वैयक्तिक आयुष्य नेहमीच आनंदी असत नाही.. आपल्या आईची मात्र त्याने शेवटपर्यंत सेवा केली.. त्याच अचानक हार्टफेलने जाण मात्र दु:खदायक आहे.. नजरेसमोर तळपलेले एक एक तारे नीखळू लागले की अस्वस्थता वाढत जाते.. देव त्याच भल करो.. त्याला शांती प्रदान करो..पट्या कायम स्मरणात रहाशील रे,” अशा शब्दांत वसुंधरा साबळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.